Wednesday, 20 September 2017

फॉर अ चेंज

"ये ना. बैस", त्यानं सोफ्याकडे हात केला.
आजूबाजूला त्याचं घर न्याहाळत ती सोफ्यावर बसली.

"बी कंफर्टेबल हां. आणि हो, इतक्या रात्री तेही असा मुसळधार पाऊस कोसळताना मी असं तुला घेऊन आलो घरी म्हणून संकोचु नकोस. अजूनतरी बायकोची थोडी धास्ती आहे मला.", असं म्हणून तो दिलखुलास हसला.

तिनं बारकाईनं त्याचं घर पाहिलं. भिंतीवर त्याच्या सुखी कुटुंबाची तसबीर लटकत होती. घर अगदी चकाचक होतं. बायको माहेरी गेल्यावर आपल्या घराच्या होणाऱ्या अवस्थेची कल्पनाच न केलेली बरी असं तिला वाटून गेलं. क्षणभर मागच्या खेपेचं नवऱ्याशी झालेलं भांडणही आठवलं. तिनं घरात पाऊल ठेवताच कुबट वास तिच्या नाकात भरून राहिला होता. घरभर पसरलेली रद्दी, उष्ट्या भांड्यांनी भरलेलं सिंक, विस्कटलेलं बेडशीट, आणि हो, बेडरूम मधले संशयास्पद ग्लास. इतक्या दिवसांनी नवऱ्याला भेटण्याचा तिचा सगळा हुरूप या नजाऱ्याने कुठल्या कुठे पळाला होता.

एका क्षणात हे सारं तिच्या डोळ्यापुढे आलं, पण तिने कटाक्षाने ते विचार दूर ढकलले. तो तिच्यासाठी टॉवेल घेऊन अलेलंही तिला समजलं नाही.
"काय गं तंद्री, कॉलेजमधली सवय तशीच दिसते अजूनही", तिच्या डोक्यात टॉवेल टाकून तो हसत तिच्याकडे पहात होता.
त्याच्या गालावरच्या खळीकडे तिचं लक्ष गेलं. ती थोडी सैलावली.

"कॉफी घेशील ना?", त्यानं विचारलं.

"हो, मला एक चमचा साखर."

"मॅडम, हे काय सांगायला हवं का! कितीतरी कॉफी शॉप मध्ये हे वाक्य तुझ्या तोंडून मी ऐकलंय"

थोड्याच वेळात तो वाफळते कप घेऊन हजर झाला.

कॉफी पितानाची ती शांतता त्याला नको वाटली.

"तुझंही लग्न झालंय म्हणून विचारतो. डोन्ट बी ऑफेंडेड हां. मला एक सांग, लग्न झालं, कालांतराने मुलं झाली की तुम्हा मुलींच्यातली प्रेयसी कुठे हरवून जाते का गं?"

तिला हा प्रश्न अनपेक्षित होता.
"का? असं एकदम..", तिनं गोंधळून विचारलं.

"अगं बघ ना, मुलं बाळं झाली की त्यांचे डबे, होम वर्क, त्यांचं टाईम टेबल सांभाळणे, वाणसामान यात नवऱ्याचा तो इंटिमेट करणारा स्पर्श, ती नजर तुम्हाला काळतच नाही का? कधीतरी मुलांशिवाय मुव्ही पहावी, थ्री बी एच के फ्लॅट मध्ये मुलांना कधीतरी शेजारच्या बेडरूम मध्ये झोपवावं, कधीतरी मुलांना न घेता रेस्टॉरंटमध्ये जावं हे असं तुम्हाला वाटतच नाही?"

"हो, पण नवऱ्यामधला प्रियकर तरी कुठे पूर्वीसारखा ताजा असतो? तुम्हालाही कधी वाटत नाही, एखाद्या दिवशी क्रिकेटची मॅच सोडून तिला विचारावं की काही मदत हवीये का, किंवा कधीतरी एखादा गजरा? मुव्हीला तिनं यावं असं फक्त वाटतं तुम्हाला, पण कधी तिकिटं बुक करावी असं नाही वाटत?"

तिनं भुवया उंचावून प्रतिप्रश्न केला. तो विचारात गढून गेला.
तिच्या थोडं जवळ जात, तिच्या ओल्या केसांत बोटं फिरवत तो म्हणाला, "हो, पण कधीतरी चेंज हवाच असतो ना."

तिला त्या दोघांचे कॉलेजचे दिवस आठवले आणि तिलाही अनावर झालं.

त्याच्या शक्य तितक्या जवळ जात ती म्हणाली, "मुलांची काळजी घेता घेता तुझ्याकडे दुर्लक्ष होतंय हे आधी नाही का सांगायचे?"
आता त्यालाही अनोळख्याचं नाटक पुरे झालं होतं, "आणि तू तरी कुठे बोललीस की तुही एका मोगऱ्याच्या वेणीची वाट पाहतेयस?"

"पण म्हणून हे असं परक्यासारखं वागायचं का?", डोळे पुसत ती त्याला अजून एकदा बिलगली.

"कधी कधी, फॉर अ चेंज आपल्याच आयुष्याकडे त्रयस्थ नजरेनं पहावं, न दिसलेले कानेकोपरे स्वच्छ दिसतात. म्हणून हे सारं नाटक. बाकी तुझ्या डोळ्यांत पाणी मला आजही आवडत नाही हां", तिच्या केसांतून हात फिरवत त्यानं तिला गोंजारलं. आणि दुसऱ्या हाताने हलकेच खोलीतला दिवा विझवला.

Friday, 11 August 2017

आमची माती, आमची माणसं

देशस्थी गोतावळा लाभलेल्या आमच्या घरी उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्ट्यांना नेहमी पाहुण्यांचा राबता असायचा. आणि साहजिकच आम्हालाही सुट्टीला जायला अनेक हक्काच्या जागा होत्या. आत्या, मावश्या, आजोळ यांचा तुटवडा नव्हता. अनेक ठिकाणी अनेक सुट्ट्या घालवल्या आणि प्रत्येक सुट्टीची वेगळी खासियत असायची. पण मोठं होईल तसं हे आत्या-मावशांकडे सुट्टीला जाणं जवळ जवळ बंदच झालं, अर्थात पोटापाण्याच्या उद्योगाला लागल्यावर सुट्ट्याही इतिहासजमा झाल्या.

माझं कॉलेज संपत आलं तसं आम्ही ठरवून दर वर्षी पंधराएक दिवस आमच्या गावी सुट्टीला जायला लागलो. शक्यतो हिवाळ्याच्या दिवसांत, पाऊस कमी झालेला असताना आणि कडाक्याची थंडी पडलेली नसताना आम्ही तिकडे दौरा काढायचो. मुक्काम पोस्ट कसबा सांगाव, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर...!! पश्चिम महाराष्ट्रातल्या ग्रीन बेल्टमध्ये असलेल्या या गावात भाजीपाला, दूध-दुभतं आणि माणुसकीची रेलचेल.

मी tcs ला गेल्यावरही पुढची २-३ वर्षे या मार्गशीर्षाल्या सुट्टीसाठी माझ्या रजा राखून ठेवायचे. आम्ही सुट्टीला १०-१५ दिवस गावी जायचो. २०१२ मध्ये घरातल्या तुळया काढून गिलावा केला. आमच्या दादांनी तो सगळा लाकूडफाटा पोत्यात भरून ठेवला. मग आम्ही सुट्टीला गेल्यावर आईनं चूल पेटवली, जळण भरपूर होतंच. मग सकाळ संध्याकाळ भाकरी, पोकळ्याची ताजी भाजी आणि मातीच्या घरातलं आंबट गोड दही असा मेनू असायचा. वर वायलीवर शिजलेला डाळ भात. स्वर्गसुख म्हणतात ते हेच असावं नक्की.

सकाळी अंघोळीचं पाणीही चुलीवरच तापवलं जायचं. चुलीवर पितळेच्या हंड्यात तापवलेल्या पाण्यात गर्मी खूप असते. हे पाणी पुष्कळ वेळ कढत राहतं. जो शेवटी अंघोळ करणार त्याची चैनी, कारण त्याला भरपूर ऊन ऊन पाणी मिळायचं. सकाळच्या गुलाबी थंडीत हंड्याच्या चुलीपुढे बसणं म्हणजे जन्नत !! थोडं धुरकट पण अगदी उबदार वाटायचं तिथे. आगीत रसरसलेले लालेलाल विस्तव तासन् तास पाहणं हा माझा आवडीचा कार्यक्रम.

अशाच एका सुट्टीत आम्ही गावातल्या देवाप्पा काकांच्या भजनी मंडळाला घरी भजनाला बोलावलं होतं. ही मंडळी कुठल्याच बिदागीची मागणी नाही करत. यांना जेवायला तर्रीवाली आमटी आणि मसाले भात करायचा. जेवणं झाली की घरात उदबत्तीचा घमघमाट पसरतो, सगळ्यांच्या कपाळावर बुक्क्याचे टिळे येतात, पेटीच्या सुरावर तबला आणि डग्गा सेट होतो, आणि मग टाळ-मृदंग गरजू लागतात. "जय जय राम कृष्ण हरी.."नं भजनाची सुरुवात होते आणि पंचपदीने शेवट. कुठल्याही सिनेगीतांची चाल नसलेली अस्सल वारकरी संप्रदायातली ही भजनं पहाटे दोनेक वाजेपर्यंत रंगतात.

गावाकडे आम्ही टीव्हीला डिश कनेक्शन घेऊन ठेवलं होतं. पण कधी टीव्हीपुढं बसल्याचं स्मरणात नाही. दुपारी जेवण झाल्यावरचा प्रोग्रॅम ठरलेला असायचा. आजीची अर्ध्या पाऊण तासांची वामकुक्षी झाली की डिशवर विविध भारती लावून आजी, आई-दादा आणि मी पत्त्यांचा डाव टाकायचो. तसे आम्ही सगळेच पत्ते खेळायला पटाईत. अनेक डाव आम्हाला यायचे, पण आम्ही नेहमी "बोले सो करे" अर्थात judgement हा एकच डाव टाकायचो. आणि सगळेचजण अगदी विजिगीषू वृत्तीने खेळणारे!

मार्गशीर्ष महिन्यात भूक पण कडकडून लागायची. तिन्हीसांजेला कुणीतरी ताजा ताजा पाला शेतातून काढून आणून द्यायचं. गवळण नुकतं धार काढलेलं कोमट दूध आणायची. संध्याकाळच्या वेळेला कोवळी कणसं, ओल्या हरभऱ्याचे घाटे, मातकटलेली कोवळी आणि गोड गाजरं, एखाद् दुसरी शेवग्याची शेंग, ज्वारीची मऊ धाटकं, खरवसाचं दूध, ताजी ताजी रताळं असं काही बाही कुणी कुणी रोज घरी आणून द्यायचं. ही मार्गशीर्षातली सुट्टी मला जवळ जवळ वयाच्या पंचवीशीपर्यंत अनुभवता आली.

आता गाव सुधारला, सगळीकडे पाणी आलं, आणि ऊस व्हायला लागला. माणसं मिळेनात म्हणून मातीच्या भिंतींना गिलावे केले गेले आणि सारवणं बंद पडली. पाण्याला मोटर्स बसल्या, शहाबादी फारशा जाऊन तिथे चकचकीत टाईल्स आल्या. पण सुदैवाने अजून गावाकडच्या माणसातलं माणूसपण टिकून आहे. आमच्या पुढल्या पिढीला कदाचित आम्ही अनुभवलेला मार्गशीर्ष आम्ही देऊ शकू की नाही ते माहित नाही. पण त्या माणसांचा ओलावा, त्या मातीची ओळख नक्कीच करून देऊ !!