Wednesday 19 December 2012

कतरा कतरा मिलती है...

मानवी जगणं हे कसं छोट्याछोट्या क्षणात अडकून पडलेलं असतं ना! आणि आपण मात्र मोठमोठ्या achievements च्या नादात हे जगणं कणाकणानं गोळा करायला विसरूनच जातो. गरम गरम चहाचा कडक प्याला, दोघांत एक करून खाल्लेलं वाफाळतं कणीस, पारिजातकाचा पहिला वाहिला बहर, आईच्या कुशीत घालवलेली रात्र, ग्रीष्मात surprisingly आलेली वळीवाची सर, कधी झोपेतून जाग आल्या आल्या कानावर पडलेला चिवचिवाट, आपल्या घरातलं छोट्या पिल्लानं टाकलेलं पहिलं पाऊल, नाकातोंडातून पाणी येत असलं तरी "भैय्या और तिखी बनाओ" असं म्हणत खाल्लेली पाणीपुरी, हिवाळ्याच्या एखाद्यापहाटेला पडलेलं गच्च आल्हाददायी धुकं, जुन्या फोटोंचे गठ्ठे काढून त्यांच्यात दिवस दिवसभर रमणं असे कित्ती कित्ती क्षण वाटेवर अगदी सहज भेटतात...आणि जगणं कणाकणानं भरून टाकतात.

अलीकडेच gallery मध्ये एक तुळशीचं रोपटं लावलंय. आणि तेही असंच रोज कणाकणानं आनंद देतंय. त्याला रोज पाणी घालणं, त्याला कुरवाळणं, त्याच्या मुळाशी माती मोकळी करणं या गोष्टीचं केवढं म्हणून अप्रूप! आता त्याला जेव्हा मंजिऱ्या फुटतील तेव्हा तर आम्ही दोघं  grand celebration च करणारे..

गुलझार म्हणतात ना,
              कतरा कतरा मिलती है, कतरा कतरा जीने दो,
              जिंदगी है, बेहने दो....बेहने दो.....

Friday 14 December 2012

स्वातंत्र्यसैनिक

महाराष्ट्र शासनातर्फे प्रसिद्ध होत असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांवरील संशोधनपर बखरीमध्ये आमचे आजोबा आण्णा यांच्या कार्याचाही समावेश होत आहे. यामध्ये समाविष्ट करण्यासाठी पुढील मजकूर देण्यात येत आहे. आण्णांच्या कार्याचा अल्पपरीचय:

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कोल्हापूर जिल्ह्यात १९४० च्या दशकात महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरीत होऊन अनेक तरुणांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. यांच्यात वयाने सर्वात लहान असणारे श्री. विष्णूपंत वासूदेव देशपांडे ऊर्फ आण्णा यांनीदेखील शाळकरी वयातच शिक्षण अर्धवट सोडून भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली.
विष्णूपंत देशपांडे मूळचे कागल तालुक्यातील कसबा सांगावाचे. १९३७ साली त्यांनी वाय. सी. पाटील, नागनाथआण्णा नायकवडी व बाळू कुंभार यांच्या सहाय्याने क|| सांगाव येथील चावडीतील इंग्रज अधिकाऱ्यांना चकमा दिला व त्यांच्या ताब्यात असलेल्या बंदूका पळविल्या.
१९३८ सालच्या हुपरी डाक बंगला जळीत पार्क प्रकरणात आण्णांचा सहभाग राहिला. या प्रकरणात हुपरी येथील इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या बंगल्याला स्वातंत्र्य सैनिकांच्या समूहाने चहुबाजूंनी आग लावली होती. याच सुमारास १९३९ साली आण्णांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या एका तुकडीसोबत कोल्हापूरातील सरकारी खजिना लुटला व गारगोटीस पलायन केले.
पुढील काही वर्षात देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी स्थापन केलेल्या प्रजा परीषद सहकारी चळवळीत अण्णांचा सक्रीय सहभाग राहिला. पुढे जाऊन अण्णांनी कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेस सेवादल युवक संघटनेचे प्रमुखपद सांभाळले. या संघटनेतर्फे अण्णांनी अनेक तरुणांना हाताशी घेऊन खेडोपाडी जाऊन प्रभातफेऱ्या काढल्या. स्वदेशी मालाचा प्रचार केला. जातीभेद व अस्पृश्यता यांच्याविरोधात जनजागृती केली. आण्णांनी आमरण खादीचे कपडे वापरले. तसेच चहा, कॉफी आणि परदेशी मालाचा आयुष्यभर त्याग केला.
१९४० साली हुपरी जाळीत पार्क प्रकरणी अण्णांना इंग्रज सरकारने अटक केली. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून खटला चालविण्यात आला. खटला सुनावणी दरम्यान आण्णांना कोल्हापूर येथील बिंदू चौक तुरुंगात ११ महिने सध्या कैदेची शिक्षा भोगावी लागली. खटल्याच्या निकालाअंती इंग्रज सरकारने त्यांना साडे सात वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर १९४७ साली भारताच्या स्वातंत्र्यानंतरच त्यांची सुटका झाली.
१९७२ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते ताम्रपट प्रदान करून अण्णांचा गौरव करण्यात आला. याव्यतिरिक्त महाराष्ट्र शासन तसेच कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्यातर्फे सन्मानपत्र देऊन अण्णांना गौरविण्यात आले.

Tuesday 11 December 2012

...उगीचच!!!

एक विचारू? एक सांगशील?
उगीच रहायचं प्रश्नांची जाळी विणत
आणि उगीचच करायच्या शब्दांच्या कसरती
खरं तर सगळी उत्तरं आधीच डोळ्यातून झिरपयाची...
उगीच खेळायचे प्रश्नोत्तरांचे डाव
शब्दांना उगीचच लावायचे विरामचिन्हांचे टेकू
आणि उगीचच माहित असलेल्या प्रश्नांची माहित असलेली उत्तरं
फिरून फिरून घोळवायची...

उगीच घालायचा एकमेकांभोवती पिंगा
आणि उगीचच धरायचा हातामध्ये हात
उगीच लावायचा जीव, उगीच घालायचे वाद
उगीच चिडणे, उगीच रुसणे
आणि उगीचच पोकळ स्वप्नांची रात्र जागून जागून जगायची...

आपले सगळे प्रश्न
आणि आपलीच ती उत्तरं उगीचच गेली विरून...
आपले ते वाद
आणि आपलीच ती स्वप्नं उगीचच गेली सरून...
आपलेच ते शब्द
आणि आपलीच ती विरामचिन्हं उगीचच गेली गळून...
...उगीचच!!!
....................................................................................................................प्रतिमा