रवींद्रनाथ टागोर यांची The Flower School हि कविता वाचली. या कवितेचा मी अनुवाद करावा इतकी माझी योग्यताही नाही आणि पात्रताही नाही…हवं तर असं म्हणेन कि त्यांची कविता मराठीतून मी हि अशी वाचली-
फुलांची बाळं ढगांचा धुड्डुम धुड्डम आवाज येऊ लागलाय पावसाळी वारा वेळूतून शीळ घालू लागलाय
आता फुलांची जणू जत्राच भरून जाईल कुठून कुठून रंगीत रंगीत फुलं उगवुन येतील आणि ही फुलं गारांच्या पावसात नाचतील, बागडतील एकमेकांशी शिवाशिवी खेळतील तुला माहितीये आई… ही फुलं किनै शाळेत जातात त्यांचीही एक शाळा असते, खोल खोल जमिनीच्या आत ही फुलं वर्गाचं दार लावून गृहपाठ करतात आणि मधल्या सुट्टीत लपाछपी खेळायला जातात
जेव्हा काळे काळे ढग येतात आणि पाऊस पडायला लागतो तेव्हा परीक्षा-बिरीक्षा सगळं संपून फुलांना खूप मोठी सुट्टी लागते
मग सगळ्या फांद्या, सगळी पानं आणि आकाशातले ढगसुद्धा सगळे सगळे खूप खूप खुश होतात जोरजोरानि टाळ्या वाजवतात मग ही फुलांची बाळं रंगीत झगे नि लाल-पिवळे सदरे घालून झाडांच्यावर सुट्टीला येतात
तुला माहितीये आई? त्यांचं घर किनै असतं उंच आकाशात चांदण्यांच्या घराजवळ तू पाहिलं नाहीस का आई…किती गडबडीनं हि फुलं घरी पळून जातात तुला नं आई माहितीच नाहीये फुलांची एक गंमत आकाशात ना त्यांची पण असते एक आई ती त्यांना रात्री कुशीत घेऊन थोपटते, आणि गोष्टसुद्धा सनग्ते…आणि मग अंगाई गाते जशी तू मला कुरवाळतेस आणि आणि माझे गालगुच्चे घेतेस ना…अग्गदी तस्सं!!!
तीन तास निखळ आनंद देऊनही जाता जाता मनात थोडी रुखरुख ठेऊन जाणाऱ्या चित्रपटांपैकी एक म्हणजे हृषिकेश मुखर्जींचा “आनंद”. चित्रपटाच्या क्लायमॅक्सला जन्म-मृत्यूच्या उंबरठ्यावरचा आनंद आणि
बॅकग्राउंडला ग्रामोफोनवर वाजणारी कविता यांच्या मिक्सिंगमुळे हृषिदांनी जो काही परिणाम साधलाय तो केवळ वर्णनातीत!
आज क्षितिजवरच्या या बुडत्या सूर्याला पाहून “आनंद” मधील नेमका हाच प्रसंग आठवला आणि त्याचबरोबर ग्रामोफोनवर अमिताभच्या गंभीर आवाजात वाजणारी गुलजारांची “एक नज़्म”..
मुझसे एक नज़्म का वादा है, मिलेगी मुझको डूबती नब्ज़ों में जाब दर्द को निंद आने
लगे ज़र्द-सा चेहरा लिये चाँदउफ़क़ पर पहुँचे दिन अभी पानी में हो, रात
किनारे के क़रीब न अँधेरा, न उजाला हो, यह न रात न दिन जिस्म जब ख़त्म हो और रूह को जब साँस आए मुझसे एक नज़्म का वादा है, मिलेगी मुझको
ठिकाण: मडीकेरी(कर्नाटक), एक रम्य कॉफीचा मळा, आजूबाजूला काळ्या मिरीचे वेल...एकूण काय तर वातावरण इतकं सुंदर की मनात वाटतच होतं की आज एकतरी हास्या भेटेलच...इकडे तिकडे शोध घेत असतानाच सखी अशी काही भेटली की वाटलं हीच हास्या...आणि मग सखीला कॅमेऱ्यात बंदिस्त करून मिळाली ती अपूर्व हास्या!!!
गूढ किंवा कधी कधी दुर्बोध वाटणाऱ्याग्रेसांच्या कविता. महानोर
मातीच्या, रानाच्या कवितांना चिकटलेले. मर्ढेकर शहरी, सामान्य माणसाच्या
वाटेवरचे. शांताबाई सोशिक, प्रेमळ स्त्रीचा हात धरून चालणाऱ्या. बघायला
गेलं तर प्रत्येक कवीची आणि त्याच्या काव्याची एक खासियत. पण जेव्हा आरती
प्रभू हे नाव समोर येतं तेव्हा त्याला बसवण्यासाठी कुठला साचा सापडतच
नाही. अनेक अंगांनी फुललेलं प्रभूंचं काव्य...त्याला अशी चिठ्ठी लावणं तसं
जरा अवघडच. प्रभूंच्या कविता बऱ्याचदा अनेक कोनातून पाहता येतात. पुष्कळदा
असं होतं की एकाच व्यक्तीला प्रभूंच्या एकाच कवितेचे अनेक रंग सापडतील.
अगदी असंच माझंही झालं, जेव्हा "लव लव करी पातं..." कविता वाचली.
ही
कविता मला द्वयर्थी वाटते. कधी म्हातारपण जवळ आलेल्या बाईची व्यथा असलेली
वाटते तर कधी तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अल्लड प्रेमिकेची वाटते. म्हातारपणात डोळ्याची पती लवू लागतात, इतकी की ताऱ्याची
लुकलुक पण
पाहू शकणार नाहीत. आयुष्यबद्दल फारशी आस्था उरलेली नसते...चव चव गेली सारी
म्हणजे हेच..आयुष्यात सगळं भोगून झालं, आता कसलीच इच्छा उरली नाही.
शरीरातही फारसा जोम, उत्साह राहिलेला नाही...हे किती वेगळ्या शब्दांत
सांगितलंय...जोर नाही वाऱ्याला!
कुणी कुणी नाही आलं फड फड राव्याची
ऋणु झुणु हवा का ही गाय उभी दाव्याची
हे
तर अगदीच खास कडवं...एक राव्याची फडफड सोडली तर कुणाचा मागमूसही
नाही. पण वाटतं कुणीतरी येईल, आपली विचारपूस करेल. त्यामुळं साधी हवेची
लकेर जरी आली तरी कान टवकारले जातात. दाव्याला बांधलेली गाय अशीच असते.
गोठ्याच्या दारात जरी कुणी आलं तरी तिला पटकन कळंतं आणि ती कानोसा
घेते....तशीच ही अवस्था..कुणीतरी आलंय, कुणीतरी यावं असंच वाटतं...पण शरीराची गत
अशी दाव्याला बांधल्याप्रमाणं!
तट तट करी चोळी तुट तुट गाठीची
उंबऱ्याशी जागी आहे पारुबाई साठीची
गाठीपाशी
तुटलेली चोळी कशी बेभरवशाची...त्याचप्रमाणं हे शरीर. या आयुष्याचा हा
उंबरठा आहे...पारुबाई साठीची! साठीची हा शब्द उतारवायला रूपक म्हणून वापरला
असावा. हा जीव कधी या थकलेल्या शरीराला सोडून जाईल याचा नेम नाही.
निवडुंग चित्रपटात हे गण दिसतं ते वेगळ्याच angle मधून. कदाचित
हृदयनाथ मंगेशकरांना प्रभूंच्या कवितेची ही अशी दुसरी बाजू भावली असेल
म्हणून त्यांनी त्याचं इतकं सुंदर आणि romantic गाणं बनवलं असावं. प्रेमात
पडलेल्या मुलीच्या तोंडी आहे हे गाणं. पहिल्या अंतऱ्यात मनाची अस्वस्थता
दिसते. मन इतकं सैरभैर झालंय की त्यावर अंकुश ठेवणं म्हणजे जणू पाऱ्याला
मुठीत पकडण्याइतकं कठीण होऊन बसलंय. प्रेमात तहान भूक सारं हरवून गेलंय.
खरं तर कुणीच नाही आलं, नुसते
राव्यानं पंख जरी फडफडवले, किंवा हवेची झुळूक जरी आली तरी 'तो' आल्याचा भास
होतो. दाव्याची गाय जशी कानोसा घेते होते त्याप्रमाणं मन त्याची चाहूल
लागते का याचा कानोसा घेतं.
उंबऱ्याशी जागी आहे पारुबाई साठीची या गाण्यातल्या वाक्यावर रवींद्र
मंकणीच्या आईवर कॅमेरा फोकस होतो. जरा उंबरयावरच्या पारूबाईचं(स्वत:च्या आईचं) तरी भान ठेव
असं सांगायचं असेल तिला कदाचित!!!